२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला दर्शवला आहे. त्याची प्रचिती दादर शिवाजी पार्क येथे काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या नागरिकांशी संवाद सधण्याच्या कार्यक्रमाला न बोलवता सुद्धा मनसेचे संदीप देशपांडे यांनी हजेरी लावल्यामुळे अनेकांना धक्का बसलेला होता. तसेच काँग्रेसच्या नवनिर्वाचित उमेदवार उर्मिला मार्तोडकर यांनी सुद्धा आपल्या मराठी संभाषणाने मराठी माणसाची मने जिंकून घेतलेली आहेत त्यामुळे मार्तोडकर यांच्या सुद्धा प्रचाराला मनसे पाठिंबा दर्शवेल असेच चित्र सध्या दिसून येत आहे. परंतु मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून उभे असलेले काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांना मनसेने ठेंगा दाखविलेला आहे.
मनसेची उत्तर भारतीयांविरोधी भूमिका सर्वांना ठाऊक आहे. त्यात निरूपमनी ‘उत्तर भारतीय मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी काम बंद केले तर मुंबई ठप्प होईल’ असे वक्तव्य केले होते. यावर मनसेने कडाडून टीका केली होती. तसेच मनसे आणि संजय निरूपम यांच्यामध्ये अनेक वेळा शाब्दिक युद्ध पहायला मिळाले आहे. उत्तर मध्य मुंबईत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय निरूपम उभे आहेत. मनसेने केलेल्या फेरीवाला आंदोलनाच्या वेळी निरूपम यांनी मनसेवर अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे निरूपम यांना मनसेचे कार्यकर्ते मत देतील असे वाटत नाही, याचा अप्रत्यक्ष फायदा किर्तीकर यांना होऊ शकतो’, असे मत राजकीय विश्लेषक किर्तीकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
मनसेने घेतलेल्या अनेक उत्तर भारतीय विरोधातील भूमिकेला काँग्रेस संजय निरुपम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अनेकवेळा वाद झालेले दिसून आलेले आहे. त्यामुळे जरी मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसली तरी मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून उभे राहिलेल्या संजय निरूपमचा प्रचार करणार नाहीत असेच चित्र दिसून येत आहे.