शरद पवार जातीय विष पसरवत आहे – देवेंद्र फडणवीस

राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याचे वारंवार शरद पवार जनतेच्या मनावर ठसवत असून, त्यामागे महाराष्ट्रात जातीय विष पेरण्याचा त्यांचा डाव असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विरोधी पक्षांचे नेते फोडण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप फेटाळताना तसे केले असते, तर अनेक पक्षांचे वरिष्ठ नेतेही भाजपमध्ये असते, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. शरद पवार यांनी आपल्या भाषणात अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची जात काढलेली आहे. परंतु ते यशस्वी होणार नाही, असे सांगताना आता तर पवारांनी काँग्रेसही चालवायला घेतली असल्याचा टोला सुद्धा पवारांना लगावला होता.

मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वारंवार सांगत आहेत. तसे जनतेच्या मनावर ठसवले, तर आमच्याबद्दल द्वेष निर्माण होईल, असे त्यांना वाटते. मात्र, जातीभेदाचे विष महाराष्ट्रात पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे सांगताना आता तर पवारांनी काँग्रेसही चालवायला घेतली असल्याचा टोला लगावला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ज्या घोषणा करतात, त्या भाजपने कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या खात्यात ७२ हजार कुठून येणार, हे राहुल गांधी सांगू शकले नाहीत. मात्र, भाजप जबाबदार पक्ष असल्याने शब्द देताना तरतूद करावीच लागेल, याची जाणीव ठेवून संवेदनशील पंतप्रधानांनी समाजाची गरज ओळखून केलेले संवेदनशील घोषणापत्र, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या संकल्पपत्राचे वर्णन केले. गेल्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या ५४० आश्‍वासनांपैकी ५२० पूर्ण झाली असून, २० पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असाही दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here