शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्थ असले तरी “आदित्य संवाद” च्या माध्यमातून तरुणांनाशी संपर्क साधत आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढी काही सांगू पाहते. या तरुणाईच्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तर देण्यासाठी तसेच त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार, २२ एप्रिल रोजी मुंबईत वरळी येथे होणाऱ्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात मुंबईतील तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे तरुणांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे, असेच बोलले जात आहे.
देशातील सर्वात मोठी शक्ती असणाऱ्या युवकांच्या समस्या व विचारांसाठी ‘आदित्य संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून चर्चासत्रात्मक व्यासपीठ तरुणांना उपलब्ध झाले आहे. संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक या प्रमुख शहरांत या उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आदित्य संवाद’ उपक्रमातील पहिल्या टप्प्यातील चौथ्या सत्रात आदित्य ठाकरे १५ हजार युवकांशी थेट तर १५ लाख युवकांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधणार आहेत. वरळी येथील एनएससीआय डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये सोमवार, २२ एप्रिल सायंकाळी ५ वाजता होणारा ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम १८ ते ३० वयोगटातील मुंबईकरांसाठी खुला आहे. मुंबईमधील वाणिज्य, कला, विज्ञान, इंजिनीयरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, सांस्कृतिक, क्रीडा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील युवक–युवती यामध्ये सहभागी होणार आहेत.