लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. त्यातच शिरूर मतदार संघाची लढत अधिक प्रतिष्ठेची होत असताना दिसत आहे. शिरूर मतदार संघातून शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षातून बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी पक्षातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यातच पहिल्यांदा शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता.
कोल्हे यांच्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या व्यक्तीला महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कामे माहिती नाही, अशा अभिनेत्याला दिल्लीत पाठवून नवीन सिरीयल काढणार का, असा प्रश्नच उपस्थित जनतेला केला होता. ज्या व्यक्तीने भगव्याशी गद्दारी केली अशा व्यक्तीला निवडणून देणार का? असा सवालच थेट उपस्थित करून जनतेला विचार करायला भाग पाडले होते. दरम्यान १५ काँग्रेस आणि भ्रष्टवादीच्या सरकारने शेतकरी, सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करून ठेवलं, असं आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.