बेस्टचे तिकीट दर कमी झाल्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांनी प्रवासासाठी पहिली पसंती बेस्टला दिलेली आहे. त्यामुळे तिकीट कपातीचा बेस्टने घेतलेला निर्णय योग्यच ठरलेला आहे असेच चित्र आज दिसून येते. रविवार १४ जुलै रोजी बेस्टची १४ लाख ६३ हजार ८२१ तिकीट विक्री झाली आहे. म्हणजे प्रत्येक तिकिटामागे एक प्रवाशी असे गृहीत धरता किमान एवढय़ा संख्येने रविवार असूनही मुंबईकरांनी बेस्टला पसंती दिली आहे. तिकीटदर कमी होण्यापूर्वी म्हणजेच ७ जुलैची आकडेवारी पाहता या वेळी रविवारच्या प्रवाशी संख्येत ४ लाख ८४ हजार ६४६ भर पडली आहे.
बेस्टने साध्या बसचे किमान तिकीट दर पाच तर एसी बसचे किमान तिकीट सहा रूपये केल्यानंतर ९ जुलैपासून प्रवाशांनी पुन्हा बेस्टकडे आपली पावले वळविली आहेत. त्यामुळे प्रवाशी संख्या सात लाखांपर्यंत वाढत गेली. उत्पन्न मात्र दोन कोटीहून कमी होत गेले. तसेच पासधारकांची संख्याही वाढल्याचे समोर आले. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत बहुतांश सरकारी कंपन्या व खासगी कंपन्यांच्या कार्यालयांना सुट्टी असते. त्यातच अनेक छोटे-मोठे उद्योग व्यवसायही बंद असतात. त्यामुळे विकेण्डचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर बाहेर पडतात.