पुणे – गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहन उद्योगासह विविध क्षेत्रांसाठी बऱ्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, या सवलती एक तर फार उशिरा देण्यात आल्या आहेत आणि त्या अत्यल्प आहेत. त्यामुळे या सवलतीच्या आधारावर वाहन क्षेत्रातील मरगळ कमी होणार नाही, अशी भावना वितरकाकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन विक्री कमी झाल्यानंतर या क्षेत्रातील वितरक ते उत्पादकांकडून सरकारकडे सवलतींची मागणी केली होती. मात्र, बऱ्याच उशिरा म्हणजे गेल्या आठवड्यात सीतारामन यांनी वाहन उद्योगासाठी काही सवलती जाहीर केल्या. सीतारामन यांनी दिलेल्या सवलतीनुसार वाहनांच्या नोंदणी शुल्कात घट केली आहे. बॅंकांना व्याजदर कमी करण्यास सांगितले असून बॅंकांचा भांडवल पुरवठा वाढविला आहे. त्याचबरोबर सरकार स्वतः वाहन आणि पायाभूत क्षेत्रावर बराच खर्च करणार आहे. मात्र, उशिरा झालेली अत्यल्प मदत मंदीची व्याप्ती कमी करू शकणार नाही. त्यामुळे वाहनांची विक्री वाढण्याची शक्यता कमी असल्याचे वितरकांनी सांगितले.
मात्र, सरकारकडून हा सवलतीचा केवळ पहिला हप्ता आहे, असे सूचित करण्यात आले आहे. यानंतर आणखी दोन सवलतीचे टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारने जास्तवेळ न घेता या सवलती देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रीक वाहनांचे वेळापत्रक त्याचबरोबर बीएस 6 मानदंड या कारणामुळे ग्राहकांच्या मनात बरेच संभ्रम आहेत. ते सरकारने सकारात्मक वातावरण निर्मिती करून दूर करण्याची गरज आहे.