शिवसेना आगामी काळात महाराष्ट्रभर देणार १० रुपयांत सकस जेवण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे १९९५ मध्ये महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना-भाजप युती सत्तेत आली. त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशानुसार केवळ एक रुपयात झुणका-भाकर देणाऱ्या केंद्रांची उभारणी महाराष्ट्रभर करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात शिव वडापाव सुरु करत मराठी मुलांना रोजगार आणि जनतेला स्वस्त दरात भूक भागवणारा वडापाव असं दुहेरी समीकरण जुळवत शिवसेनेनं कमी पैशात भूक भागवण्याचं काम केलं होतं. अलीकडेच संभाजीनगरसारख्या शहरात दहा रुपयात पोटभर जेवण शिवसेनेने उपलब्ध करून दिलेलं होतं. महाराष्ट्रात लाखो लोक आजही उपाशी राहतात. काहींना पोटभर ऍन मिळत नाही तर काही लोक एकावेळेस जेवण करून दिवस काढतात. ही समस्या लक्षात घेऊन शिवसेनेने आगामी काळात महाराष्ट्रभर केवळ १० रुपयात सकस आहार देणारी केंद्र उभारण्याचं वचन आपल्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे.
शिवसेना भवनसमोर झळकलेल्या होर्डिंगवर १० रुपयात सकस आहार देणारी केंद्रं उभारणार अशा वचनासह “हीच ती वेळ” ही टॅगलाईन वापरण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा उल्लेख असल्याचं समजतं. महाराष्ट्रभर अशा केंद्रांची उभारणी करण्याचं शिवसेनेचं नियोजन असल्याचं यावरून दिसून येतं. प्रत्येकजण काबाडकष्ट करतो त्यावेळी मिळालेला मोबदला सर्वप्रथम पोट भरण्यासाठी वापरला जातो. परंतु ज्यांच्याकडे पैसेच नाहीत अशा राज्यातील लाखो गोरगरिबांचे भुकेने हाल बेहाल होतात. शिवसेनेने या मुद्द्याला हात घालत तो प्रश्न सोडवण्याची तयारी केली आहे. तसं झाल्यास महाराष्ट्रातील तमाम गोरगरिबांचा आशीर्वाद शिवसेनेला मिळू शकतो.
महाराष्ट्रातील ओबीसी,धनगर,मुस्लिम समाजाचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर