फक्त विधानसभा कशाला, लोकसभेच्या निवडणुका सुद्धा घ्या – शरद पवार
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या’ अशा शब्दात भाजपच्या अधिवेशनातून महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ‘फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या’ असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी भीमा कोरेगाव, एल्गार परिषद अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.
‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या’, असे फडणवीस म्हणाले होते. सध्या सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे भाजपाने नेते प्रसार माध्यमांवर काहीही बडबड करताना दिसत आहे. अशी टीका सुद्धा पवारांनी केलेली आहे.