उदयोग मालकांनी काठीन परिस्थितीत कामगारांना वाऱ्यावर सोडू नये – मुख्यमंत्री
कठीण परिस्थितीत उदयोग मालकांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नका कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगार वर्गाचा मोलाचा हातभार असतो. त्यामुळेच भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.
भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदि शिवसेनेच्या कामगार संघटनेशी संबंधित पदाधिकारी सहभागी झाले होते.
काही उद्योग आणि व्यवसायांतून नोकर कपात सुरु आहे असे कळते ते चुकीचे असून कामगारांना नोकरीवरून काढू नका यासाठी मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे. एकीकडे कारखाने हे परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहे. अशा स्थितीत जे उपलब्ध आहेत त्यांना लगेच नोकऱ्या द्या आणि व्यवसाय सुरु करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.