मार्की मांगली – २ कोळसा खाण लिलावातून वगळण्याची मंत्री आदित्य ठाकरे यांची विनंती..!
राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोळसा आणि खानमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून मार्की मांगली–२ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. हा लिलाव झाल्यास संपूर्ण वनक्षेत्रातील इकोसिस्टम आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या प्राणिमात्रा आणि वन्यजीव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. मार्की मांगली–२ कोळसा ब्लॉक हा टीएटीआर–टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कॉरिडॉरमध्ये असल्यामुळे या भागातील वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे, असे आपल्या पत्रात मंत्री आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
पर्यावरणीयदृष्ट्या मौल्यवान असलेल्या या संवर्धन क्षेत्राचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पामुळे प्रदेशातील वाघ केवळ त्यांचा नैसर्गिक अधिवास गमावणार नाहीत, तर खाणकाम आणि माणसांच्या वाढत्या अस्तित्वामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे या कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.