चिमुरडीचा भूकबळीने मृत्यू, मानवाधिकार आयोगाने पाठवली योगी सरकारला नोटीस
आग्र्यात भूकबळी, उपासमारी आणि आजारपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या पाच वर्षीय बालिकेची दखल खुद्द आता केंद्रीय मानवाधिकार आयोगाने घेतलेली आहे. या संधर्भात मानवाधिकार आयोगाने उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारला नोटीस पाठवून या प्रकाराबाबत जाब विचारला आहे.
आयोगाने उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या नोटिसात चार आठवड्यांत प्रशासनाकडून पीडित कुटुंबाचं पुनर्वसन आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.मीडियामध्ये जाहीर झालेल्या बातम्यांनुसार, कुटुंबातील कमावणाऱ्या सदस्याला क्षयरोगाला सामोरं जावं लागल्याने आग्र्याच्या त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे या चिमुरडीला वेळेवर भोजन आणि उपचार मिळू शकले नाहीत.
गेल्या आठवडाभरापासून घरात अन्नाचा कणही नव्हता त्यातच तीन दिवस तापानं फणफणल्यानंतर गेल्या शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. संबंधित मुलगी बरोली अहीर तालुक्यातील नागला विधिचंद या गावची रहिवासी होती. या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरातील योगी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत होता.