अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल आणि कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीत युजीसी मार्गदर्शका नुसार १५ सप्टेंबर पासून सुरु करून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रकिया पूर्ण करावी या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून दोन दिवसात शासनास कळवावे तसेच मंगळवारी बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
या बैठकीनंतर सामंत म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षेतेखाली आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होऊन यावर मंत्री मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल.