राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील २८ महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. सदर अर्थ सहाय्य मधून शक्यतो मुलांच्या शैक्षणिक कामी खर्च करण्याचे नम्र आवाहन यावेळी मंत्री पाटील यांनी केले. ते अजिंठा शासकिय विश्रामगृह येथे चेक वाटप प्रसंगी बोलत होते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत जळगाव तालुक्यातील २८ महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ५ लाख ६० हजाराचे प्रस्ताव मंजूर असून सदर धनादेश मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी वितरीत करण्यात आले.