मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कांजूरमार्ग जागेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादावर भाष्य केले होते. प्रकल्पात कोणीही मीठाचा खडा टाकू नका. आम्ही मुंबईकरांसाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार, असा टोला नाव न घेता भारतीय जनता पक्षाला लगावला.
मेट्रो कारशेड संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला होता. आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूर येथील राज्य शासनाच्या जागेवर हलवण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. मात्र या घोषणेनंतर विरोधी पक्षाने यावर जोरदार टीका केली होती.
त्यातच केंद्राने राज्य सरकारला पत्र पाठवून सदर जागा केंद्राच्या मालकीची असल्याचे कळविले होते. यावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तर, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचारही घेतला आहे.
कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे असं काही जणं म्हणतायेत. असे म्हणणाऱ्यांना एक कळत नाही ते मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकत आहे. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व टीका करतायेत त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा मुख्यत्र्यांनी विरोधकांना दिला होता.