राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी वेगळ्या-वेगळ्या विषयांचा धागा पकडून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यात आरे कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतराची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर या निर्णयावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला होता. त्यांच्या जोडीला केंद्रातील भाजपा सरकारने ही जागा केंद्राची असल्याचा दावा करून एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आवाहन दिले होते. यावर आता एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना नेते आणि नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांजुरची जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे.
महाविकास आघाडी सरकारचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वांना अशक्य वाटणारी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ताबडतोब त्याची अंबलबजावणीही केली. त्यानंतर आलेल्या चक्रीवादळातही सरकारने मदत जाहीर केली. कोरोना काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे कटुता आली, पण लोकांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते निर्णय घेतले असे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकाने केलेल्या कामांसंदर्भात बोलताना सांगितले.