रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समीतीच्या बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
गिरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या तीन आवर्तनामुळे रब्बी हंगामास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून गिरणा प्रकल्पामुळे २३९०५ तर पांझण प्रकल्पामुळे ३६४२ असे एकूण २७ हजार ५४४ हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. शेतकऱ्यांना गव्हाणी पेरणी करावयाची असल्याने पहिले आवर्तन तातडीने सोडण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे पाटबंधारे विभागाने येत्या ५ डिसेबरला पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीला मोठी मदत होणार आहे. तर त्यानंतर पुढील आवश्यकता लक्षात घेऊन दोन आवर्तन सोडावे असा आग्रह पालकमंत्री यांनी घेतल्याने याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आनंद मोरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एम. एस.आमले, कार्यकारी अभियंता धर्मेद्रकुमार बेहरे, सल्लागार समीतीचे सदस्य प्रशांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर आदी उपस्थित होते.