मुंबई मनापामध्ये शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वाद अधिक चिघळताना दिसत आहे. त्यात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा ज्या पद्धतीने सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करत आहेत, माध्यमासमोर बोलतायेत त्यावरून कुठेतरी काँग्रेसला भाजपाच्या दावणीला बांधण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे असा आरोप त्यांनी रवी राजा यांच्यावर केला.
यशवंत जाधव म्हणाले की, कमळ चिखळात रुतलंय त्यात हात घालण्याचे काम रवी राजा करत आहेत. माध्यमासमोर बोलत असताना ते साफ चुकीचं वक्तव्य करत आहेत. विरोधीपक्ष नेते सध्या संभ्रावस्थेत असून त्यांना नक्की कोणाचं ऐकायचं हा प्रश्न पडला आहे, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांचे ऐकायचं की प्रदेशाध्यक्षांचे? मंत्र्यांचे ऐकायचे की पालकमंत्र्यांचे? या द्विधावस्थेत विरोधी पक्षनेते आहेत.
तसेच शिवसेना मागची निवडणूक स्वबळावरच लढली होती, त्यामुळे आम्हाला स्वबळ काय हे चांगले माहिती असून कोणीही दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका. आजही शिवसेना स्वबळावरच सत्तेत आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला बजावलं आहे. काँग्रेसने कुणासोबत जावे हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु भाजपाच्या साथीने कोविड निधी रोखण्याचे काम त्यांनी केले आहे असा आरोप यशवंत जाधव यांनी काँग्रेसवर लगावला होता.