सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालात शिवसेना आणि महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत विजय प्राप्त केला. या निवडणुकीत भाजपचे अनेक बडे आणि मतबल नेत्यांना गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आले होते. मात्र कोकणात काही ठिकाणी शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून कोकणात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फटका बसला असल्याचे स्वतः कबुल केले आहे. कोकणात सिंधुदुर्गात नारायण राणेंना सत्ता राखण्यात यश आले आहे.
तसेच कोकणात अनेक ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने कमळ फुलवलं आहे. या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे. सामना अग्रेलखातून एकंदर महाराष्ट्र ग्रामपंचायत निकालाचा लेखाजोखा मांडताना राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे, असे सांगताना काही ठिकाणी फटका बसल्याचे राऊतांनी सामना अग्रलेखातून मान्य केले आहे.