पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा – मुख्यमंत्री

मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची संख्या वाढविणे, फुड हब तयार करणे, बस थांब्यांचे नुतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचू नये याकरीता नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. मुंबईतील पादचारी मार्गांचे वॉडनिहाय सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यासाठी २४ वॉर्डमधील १४९ पादचारी मार्गांची निवड करण्यात आली आहे. यातील ९० टक्के मार्गांचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या मार्गांचे कशाप्रकारे सौदर्यीकरण केले जात आहे याचे सादरीकरण आयुक्त चहल यांनी केले.

मुंबईत सुमारे ३४४ उड्डाणपुल असून त्यापैकी सौंदर्यीकरणासाठी ४२ पुलांची निवड करण्यात आली आहे तर प्रत्येक वॉर्डातील पाच याप्रमाणे १२० वाहतुक बेटांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वरळी सी फेस येथे बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतुक सिग्नल अन्यत्र देखील लावावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुंबईत स्ट्रीट फुड हब करण्यात येत असून त्यासाठी ६२ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रसाधनगृहातील शौचकुपांची संख्या वाढविण्यात येणार असून नव्याने २२ हजार ७७४ शौचकुप बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी २० हजार ३०१ शौचकुपांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८६३७ नविन प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहेत.

महानगरातील ३८६ ठिकाणी पावसाचे पाणी साचून पुरस्थिती निर्माण होते. त्यातील १७१ ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून १२० ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे एकूण २९१ ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. मुंबई शहरात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरातील मंडया, उद्याने, रस्ते यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here