महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात तणावपूर्ण वातावरण दिसुन येत आहे. त्यामुळे या भागातील तणाव कमी करण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे.
या बैठकीला शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीमा भागाचे समन्वय मंत्री छगन भुजबळ व एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिले आहेत.