कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना बंद असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्व रेल्वे प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली आहे. मात्र होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या वेळेनुसार प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना देण्यात आली होती. याबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
लोकांचे हित आणि गरज पाहून सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकल सेवेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येतील असे राजशे टोपे म्हणाले आहेत. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईची लोकल सेवा कालपासून (सोमवार) सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाली असली तरी पहाटे पहिल्या लोकलपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ नंतरच सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ७ नंतर ते दुपारी १२ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सर्वसामान्यांना प्रवास करता येत नाहीय. शासनाच्या या वेळापत्रकावर मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.