केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. त्यात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या रॅलीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारावरून सर्वत्र जोरदार टीका केंद्र सरकारवर होत होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे दुःख व्यक्त केले होते. आता यावर आजच्या सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
प्रजासत्ताकदिनी म्हणजे २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे?, असा सवाल करत न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान आहे, अशी जोरदार टीका आजच्या सामनाच्या अग्रेलाखातून करण्यात आली आहे.
गेल्या साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले असे आजच्या सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा आहे. तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.