काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे नाना पटोले यांच्या खांदयावर सोपवली. यासाठी प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्याने विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. पुन्हा निवडणूक होणार असून, यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
कांग्रेसने विधानसभेचे अध्यक्षपद असलेल्या नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न प्रसार माध्यमांनी राऊतांना विचारला तेव्हा राऊत म्हणाले की, नक्कीच ती भूमिका आहे. कारण अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असे आम्ही सतत म्हटले होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असतं. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीनं राजीनामा दिल्यानं पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांचं बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात,” असे राऊत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला संजीवनी देण्याचा त्यांचा उत्साह महत्त्वाचा आहे. सत्तेमध्ये नसला तरी काँग्रेस महत्त्वाचा. पक्षाची परंपरा इतिहास महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशात काँग्रेसला संजीवनी मिळावी. मजबूतीनं काँग्रेस उभी राहावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांनी पक्षातंर्गत परिवर्तन केलं असेल, तर तो त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. नाना आम्हाला प्रिय आहेत असे सुद्धा राऊतांनी बोलून दाखविले.