भाजप आणि पंतप्रधान फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करत आहेत. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. ज्या संसदेच्या पायथ्याशी मोदी नतमस्तक झाले, तीच संसद आज द्वेषापाई बदलली जात आहे. त्याजागी नवीन संसद बनवली जात आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.
आज देशाची अर्थव्यवस्था भाजपाने कमकुवत केली आहे म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढवले जात आहेत. अशा लोकांशी आपल्याला पुढे सामना करायचा आहे, त्यामुळे आपण आपले संघटन मजबूत करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक विचार आहे. फुले -शाहू -आंबेडकरांच्या विचारांना गती देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. आपण अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पक्षाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.