अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीडीडी पुर्नविकास प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाच्या ३०० घरांची सोडत गुरुवारी जाहीर होणार आहे. ना. म. जोशी मार्गावर ही घरे उपलब्ध असून उद्या दुपारी १२.३० वाजता ही लॉटरी निघेल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
तसेच पोलिसांसाठी विरार येथे बांधण्यात आलेल्या पोलिसांच्या घराची लॉटरी आज काढण्यात आलेली असून “ज्या पोलिसांना घर हवे आहे त्यांनी म्हाडाशी संपर्क साधावा.” असे सुद्धा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. पोलिसांसोबतच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी म्हाडा घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, असे आव्हाड यांनी नमूद केले.
कोळीवाड्यांबाबतही आव्हाड यांनी भूमिका स्पष्ट केली. “कोळीवाडे ही गावठाणे आहेत. तीथे कोळी बांधवांची परंपरागत घरे आहेत. ही घरे बैठी असली तरी तिथे एसआरए योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना एफएसआय देऊन तिथला विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे आव्हाड यांनी सांगितले.