कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा ठप्प असल्यामुळे अनेकांना रस्त्यातूनच मार्ग काढत नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करावा लागला होता. मात्र रस्त्याची झालेली चाळण, अनेक ठिकांणी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे नागरिकांना प्रवासात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यात आद्यपही सामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दार बंदच आहे.
मात्र लवकरच नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या वाहतुकीचा पर्याय खुला होणार आहे. येत्या काही महिन्यातच मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक सुरू होणार आहे. या वर्षीच मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर अशी जल वाहतूक सुरु केली जाणार आहे.
येत्या २ ते ४ मार्च दरम्यान मेरीटाईम इंडिया समिट होणार आहे. त्यात जगभरातील अनेक देश आणि कंपन्या सहभागी होतील. यावर्षी या समिटचे दुसरे वर्ष असून कोरोना मुळे व्हर्चुअल पद्धतीने ही समिट होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी माहिती दिली.