मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्द्यावरून वाद झालेले पहावयास मिळाले होते . मात्र आता खुद्द राज्यपालांनी ठाकरे सरकारचे तोंडभरून कौतुक केले आहे. औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगले काम केले आहे. रोजगार सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब पोर्टल सुरु केले आहे. राज्य सरकारने आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे अशा शब्दात राज्य सरकारच्या कामाची पोचपावती दिली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून यावेळी अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली यावेळी राज्यपालांनी राज्य शासनाच्या कामाचा आढावा मांडला. मात्र दुसरीकडे विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.
राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांचे तोंडभरून कौतुक केले तसेच दाटीवाटीचा भाग असलेल्या धारावीत कोरोना रोखण्यासाठी सरकार आणि मुंबई मनपाने राबवलेल्या योजनांच्या कामांचा आढावा घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. राज्य सरकारची करोना विरुद्धची लढाई सुरु असून सरकारने आता मी जबाबदार ही योजना सुरु केली आहे. करोना संदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे असे सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी म्हणून दाखविले होते.