अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाला अवघे चार दिवस झाले आणि तिच्या लग्नाविषयी नेटकरी बरेच प्रश्न विचारु लागले. दोन वेळा घटस्फोट घेतलेल्या शार्दुल सिंह बयास याच्याशी लग्न का केलं असे प्रश्न नेहाला विचारण्यात आले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने या सर्व प्रश्नांची उत्तरं बेधडकपणे दिली. शार्दूलच्या तिसऱ्या लग्नाचा लोकांना इतका त्रास का होतोय, असाही सवाल तिने विचारला.
“हा काही मोठा विषय नाही”
नेहा म्हणाली, “यात काय मोठा विषय आहे? आजकाल करिअरला प्राधान्य देऊन अनेकजण उशिरा लग्न करतात. पण लग्नाआधी ते एकापेक्षा अधिक रिलेशनशिपमध्ये असतात. या रिलेशनशिपमधलं प्रेम, एकनिष्ठता, शारीरिक प्रेमाची गरज ही तेवढीच असते.. फक्त त्यावर कायदेशीर ठपका नसतो.”
“मीसुद्धा व्हर्जिन नाही”
“लोक फक्त शार्दूलच्या घटस्फोटांविषयी का बोलत आहेत? मीसुद्धा काही व्हर्जिन नाही. उलट शार्दूलने त्याचं प्रेम असलेल्या व्यक्तींशी लग्न तरी केलं. माझ्याबाबतीत तर लग्नाआधीच मुलांनी नातं मोडलं. कमीत कमी शार्दूलने कमिटमेंट तरी दिली होती”, असा टोला नेहाने टीकाकारांना लगावला.
“लग्नसंस्थेवरचा त्याचा विचार कायम राहिला.”
“दोन लग्नांमध्ये अपयश मिळाल्यानंतर लग्नसंस्थेवर विश्वास कायम ठेवणं काही सोपं नाही. यावरुन कळतं की त्या व्यक्तीला लग्नाचं किती महत्त्व आहे. लग्न करण्यापासून घाबरणाऱ्यांपैकी तो नाही. एखाद्याचं वैवाहिक आयुष्य चांगलं चालत नसेल तर त्याने ते नातं ढकलत पुढे नेण्यापेक्षा तिथेच पूर्णविराम द्यावा, याच मताची मी आहे” असं ती म्हणाली.
“एकमेकांचा भूतकाळ आनंदाने स्वीकारला”
या नवीन नात्याला सुरुवात करताना दोघांनीही एकमेकांचा भूतकाळ आनंदाने स्वीकारल्याचं नेहाने या मुलाखतीत सांगितलं. “शार्दूलच्या लग्नाविषयी प्रश्न आज ना उद्या विचारले जातीलच म्हणून ती गोष्ट मी लपवून ठेवली नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांचा भूतकाळ आनंदाने स्वीकारला आहे,” असं ती म्हणाली.