महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा गणेशोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरात आणि सार्वजनिक मंडळांत काल बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सव म्हटलं की अवघ्या महाराष्ट्रात उत्साह संचारतो. गणपती सार्वजनिक असो किंवा घरगुती, बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यासाठी आणि बाप्पाची आसन व्यवस्था तसेच डेकोरेशन करण्यासाठी सगळीकडे लगबग सुरु होते. सार्वजनिक मंडळं बाप्पासाठी देश-विशेषातील एखाद्या मंदिराची अथवा वास्तूची प्रतिकृती उभी करतात. केदारनाथ, तिरुपती बालाजी, सूर्यमंदिर इत्यादी मंदिरांच्या प्रतिकृती डेकोरेशन स्वरूपात उभारल्याचे आपण पाहिले असेलच. यंदाच्या गणेशोत्सवात ठिकठिकाणी अयोध्येतील नियोजित राममंदिर प्रतिकृती उभारली गेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मागील वर्षी शिवसेनेने अयोध्यावारी केली होती. अयोध्येत लवकरात लवकर राममंदिर व्हावं यासाठी शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शिवसेनेच्या या अयोध्यावारीचा प्रभाव यंदाचा गणेशोत्सवावर असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईतील मानाचा गणपती अशी ओळख असलेल्या मुंबईचा राजा या मंडळाने यंदा बाप्पासाठी भव्य राममंदिर प्रतिकृती साकारली आहे. एवढंच नव्हे तर या मंदिरात विराजमान असलेले बाप्पाही रामाच्या रूपातील आहेत. धनुष्यबाण हाती घेतलेली गणेशगल्लीच्या राजाची भव्य मूर्ती या मंडपात विराजमान झाली आहे. पुण्याच्या साने गुरुजी मंडळानेही यंदा भव्य राममंदिर देखावा साकारला आहे. या मंदिराच्या प्रतिकृतीसमोर प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती उभी करण्यात आली आहे. अयोध्या ही प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. त्यामुळे अयोध्येत राममंदिर व्हावं आणि ते लवकरात लवकर व्हावं यासाठी गेल्या २५ वर्षांपासून लढा उभा करण्यात आला आहे. मोदी सरकारचा गेल्या ५ वर्षांचा कार्यकाळ संपत आला होता तेंव्हा भाजपला राममंदिर आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली होती. त्यावेळीही महाराष्ट्रात अयोध्या फिव्हर चढला होता. एरवी पाश्चात्य सणांचा देखावा साकारणाऱ्या शॉपिंग मॉलमध्ये प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा यांची भव्यदिव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. आता यंदाच्या गणेशोत्सवातही ठिकठिकाणी राम मंदिर प्रतिकृती उभारल्याचे पाहायला मिळत आहे.
कर्जतमध्ये भगवं वादळ,पाचपैकी तीन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या