मास्क आणि सॅनिटायजर यांचा विनाकारण साठा न करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आदेश.
सध्या राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सुद्धा येत्या ३१ मार्च पर्यंत सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निम्नसरकारी कार्यलयांना घरूनच काम करण्याचे आव्हान केले आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना आणि वावरताना तोंडाला मास्क आणि हात धुण्यासाठी सॅनिटायजर वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.
त्यामुळे या दोन्ही वस्तूंची मोठया प्रमाणात मागणी वाढलेली आहे. या वाढत्या मागणीमुळे काळाबाजार करणाऱ्यांनी सुद्धा आपले डोके बाहेर काढले आहे. या गोष्टींचा काळाबाजार करणाऱ्यांना सूचक इशारा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
यावर डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, सध्या सॅनिटायजर आणि मास्क यांची मागणी वाढली आहे. तेव्हा ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या दुकानात मुबलक प्रमाणात चांगल्या दर्जाचे उत्पादन ठेवा आणि योग्य किंमतीतच ते विका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हात साबणाने धुवा, स्वच्छता राखा, सर्दी खोकला किंवा आजारपणाचे लक्षणं वाटत असतील, तर तपासणी करून घ्या, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले.