देशात आणि राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केल. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यातच आता राज्य शासनाने केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात रेशन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याचा निर्णय काल विडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या बाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना कालच पत्रं लिहून संबंधित खात्याला आदेश देण्याबाबत सुचविले आहे.
सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून राज्य शासनाला मिळते त्याव्यतिरिक्त १ लाख ५४ हजार २२० मेट्रिक टन धान्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे त्याला अनुसरूनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे, अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.