मुंबई मनपाच्या प्रयत्नांना यश रेडझोन मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट
मुंबईत कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलेला असताना मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे. मुंबईच्या वरळी भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सलग चार दिवस हा उतरता क्रम दिसत आहे. वरळीत कोरोना रूग्णांची संख्या इतर भागाच्या तुलनेत जास्त झाली होती. मात्र, गेले चार दिवस रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिल रोजी या भागात 52 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 15 एप्रिलला 27, 16 एप्रिलला 11 आणि 17 एप्रिलला 9 रुग्ण आढळले आहेत. याचा अर्थ असा की, या परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळू हळू कमी होताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनानं 23 जणांचा बळी घेतला आहे. तर 1,007 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 13,387 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 437 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यू ही चिंतेची बाब असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. त्यामुळे वेगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. देशभरात अँटी बॉडीजवर काम केलं जात आहे. प्लाझ्माच्या माध्यमातून उपचार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती दिलेली आहे.