लोकांमध्ये कायद्याचा धाक राहावा म्हणून कडक पाऊले उचलली जातील – एकनाथ शिंदे
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावात झालेल्या साधूंच्या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत होते. भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाचे राजकारण करून थेट गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. मात्र आता शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. काही लोकांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही त्यामुळे यापुढे हा धाक राहावा यासाठी कठोरातील कठोर पावले उचलली जातील, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर प्रकरणाबाबत दिला.
तसेच जिल्ह्यात प्रत्येक भागात पेट्रोलिंग आणि गस्त घालण्याचे आदेश आपण पोलिसांना दिल्याचे सांगून या प्रकरणातील दोषी हे कुठल्याही पक्षाचे असोत, कितीही मोठी व्यक्ती असो, त्यांच्यावर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस अधीक्षकांना मंत्री शिंदें यांनी दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने या घटनेतून कुठलाही बोध घेतला नसल्याचे मान्य करीत गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश मी दिले असून यापुढे अत्यावश्यक गरजेशिवाय कुणीही बाहेर पडल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.