“सध्या संपूर्ण राज्य करोना विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामूहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच हळूहळू राज्यातीप परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“करोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असं पवार म्हणाले. राज्यातील उद्योग सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.
उद्योगांच्या अडचणी सोडवणार
“पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमध्ये पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनी चालक व कामगारांचे समोर येत आहेत त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल,” असे अजित पवार म्हणाले.
हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक