कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मनपा कामगारांच्या परिवाराला ५० लाखाची नुकसान भरपाई !
सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे अत्यावश्यक सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मनपा आयुक्तांनी धडाडीचा निर्णय घेतला आहे. एखाद्या महापालिका कर्मचाऱ्याचा सेवेत असताना कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी केली आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक भरपाई देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच पालिका असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोनाची साथ आल्यापासून म्हणजे १ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर अवघ्या दहा दिवसांत ही योजना तयार करून ती लागू करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोनासाठी सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्ये या संबंधित कर्तव्यावर कार्यरत असलेल्या पालिकेतील विविध प्रवर्गातील कामगार, कर्मचारी आणि पालिकेचे कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी, मानसेवी कर्मचारी यांचा कोरोनाशी संबंधित काम बजावताना मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य लागू असेल.
यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत.
१) कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूपूर्वी १४ दिवसांच्या कालावधीमध्ये कामावर हजर असणे आवश्यक.
२) ज्या प्रकरणांमध्ये कोरोनाची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये पालिकेची
सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करून अंतिम निर्णय घेईल.
३) कामगार, कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना विविध दस्ताऐवजांसह अर्ज करावा लागेल.
४) अर्जासोबत मृत कामगार, कर्मचारी यांचे ओळखपत्र, दावाकर्त्याचा ओळख पुरावा, मृत व दावाकर्ता यांच्यातील नातेसंबंधांचा पुरावा यांची
प्रमाणित प्रत, कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा प्रयोगशाळेचा अहवालाची प्रमाणित प्रत.