कृषी कंपन्यांवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीची मागणी…!
मराठवाडा, विदर्भ भागातील शेतामध्ये अनेक बियाणे कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे अनेक शेतकाऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. एकीकडे कोरोनाचा विळखा त्यात निष्कृष्ठ दर्जाच्या बी-बियाणांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे पंचनामे करून बीज कंपन्यांवर कारवाही करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातर्फे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र अनेक कंपन्यांचे बियाणे उगवत नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याची बाब राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.