कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह रकमेत वाढ…
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. महाराष्ट्रात ४ हजार २७१ पोलिसांना कोरोनाने ग्रासले आहे. यात ४५० अधिकारी तर ३ हजार ८२१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. तर यातील ४८ पोलिसांचा कोरोनामुळे दुर्दैवी देखील मृत्यू झाला आहे.
यामध्ये आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गृहमंत्री देशमुख यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना संबंधित पोलिसाच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येणार आहे. याबाबतची घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान यापूर्वी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ६५ ते ७० लाख रुपये आर्थिक मदत केली जाईल, अशी घोषणा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली होती. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल, असेही आयुक्तांनी सांगितले होते.