भारतीय रेल्वेचे होणार खाजगीकरण, १५१ खाजगी रेल्वे धावणार ?
देशात काही महिन्यापासून लवकरच रेल्वेचेही खाजगीकरण होणार या विषयावर चर्चा होत होती. बुधवारी रेल्वे प्रशासनाने खाजगीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित केले आहे. या खाजगीकरणातून केंद्र सरकारला मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे, असे मत रेल्वे प्रशासनाने मांडले आहे.
भारतीय रेल्वे १०९ मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. या मार्गांवर जळपास १५१ रेल्वे गाड्या चालवण्याची योजना आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध पत्रक जारी करत माहिती दिली आहे. रोजगार वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवासाच्या हेतून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या योजनेअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या असतील. विशेष म्हणजे सर्व रेल्वे गाड्या भारतात तयार केलेल्या असतील. या गाड्यांचा वेग सरकारी रेल्वे गाड्यांच्या तुलनेत जास्त असेल. या रेल्वेगाड्या जवळपास ताशी १६० किमीच्या वेगाने धावतील. दरम्यान, सर्व रेल्वेगाड्यांचा निर्मितीचा, देखभालीचा आणि दररोजचा खर्च खासगी कंपन्या करतील. या योजनेअंतर्गत खासगी कंपन्यांसोबत रेल्वे मंत्रालयाचा जवळपास ३५ वर्षांचा करार होईल, असे देखील सांगण्यात आले आहे.