राज्य शिक्षण बोर्डाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत. तसेच त्याची प्रिंट आउटही घेता येणार आहे. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकालही येथे उपलब्ध होणार आहे.
१८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी वाढ झाली आहे.
मंडळाच्या या अधिकृत संकेतस्थळांवर होणार निकाल जाहीर
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.ord
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर आकडेवारी देखील उपलब्ध होईल. त्याचबरोबर www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.
निकालाबाबतचा अन्य तपशील
ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय़ांव्यतिरिक्त) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे http://verifiation.mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाईटवरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
गुणपडताळणी आणि छायाप्रतींसाठी या तारखेपर्यंत अर्ज करता येणार
- गुणपडताळणीसाठी शुक्रवार, १७ जुलै २०२० ते सोमवार, २७ जुलै २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
- छायाप्रतीसाठी शुक्रवार, १७ जुलै २०२० ते बुधवार, ०५ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
- त्यासाठी ऑनलाइन स्वरुपातच शुल्कही भरता येईल.