कोरोनावर लस येईपर्यंत शाळा बंद ठेवा – मुख्यमंत्री
कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा अखेर आजपासून सुरु होत आहेत. ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज अखेर शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून भरवण्यात येणार आहे.
मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा उघडण्याला स्थगिती देण्यात आली आहे. तर सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, उस्मानाबादसह 22 ठिकाणच्या शाळा सुरु होणार आहेत.
तर दुसरीकडे कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत शाळा, कॉलेज बंदच ठेवा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. लस आल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना प्राधान्याने मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोका पाहता पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. राज्यातील 500 हून अधिक शिक्षकही कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची शक्यता असलेल्या सर्व भागातील शाळा, कॉलेजेस बंद ठेवणे योग्य असल्याचे कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच शिक्षकांनाही 50 टक्के उपस्थितीची सक्ती रद्द करून त्यांना वर्प फ्रॉम होमची ऑनलाइन शिक्षणासाठी मुभा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.