चारपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणं टाळण्याचं आवाहन
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु अर्थात रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. मात्र, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
रात्रीच्या संचारबंदीबाबत मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. रात्रीच्या वेळेत आजिबातच घराबाहेर पडायचंच नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या या शंकांचं निरसन करताना पोलिसांनी सांगितलं की, मुंबईत रात्रीची संचारबंदी असली तरी नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, चारपेक्षा अधिक लोकांची गर्दी करता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
रात्रीच्या संचारबंदीतून कशाला मुभा, कशावर बंदी?
- नागरिकांनी आजिबातच घराबाहेर पडायचं नाही, अशी कुठलीही सक्ती नाही.
- अत्यावश्यक कामासाठी किंवा इतर कारणासाठी दोघे जण घराबाहेर पडू शकतात.
- दुचाकी आणि कारमधून नेहमीप्रमाणे प्रवास करता येणार आहे. पण कारमधून चारपेक्षा जास्त जणांनी प्रवास टाळावा.
- कामावरुन उशिरा सुटणाऱ्या लोकांना संचारबंदीच्या वेळेत प्रवास करण्यास अडचण नाही.
- अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणाऱ्यांना संचारबंदीची सक्ती नाही.
- पब, हॉटेल, सिनेमागृह अशा करमणुकीची आस्थापनं रात्री अकरा वाजता बंद करणं बंधनकारक.