“शिवसेना-राष्ट्रवादी कडून पुरवठा झाल्यानेच भाजपाला मंत्रिमंडळात चेहरे मिळाले”

“शिवसेना-राष्ट्रवादी कडून पुरवठा झाल्यानेच भाजपाला मंत्रिमंडळात चेहरे मिळाले”

महाराष्ट्र बुलेटिन : भाजपाने मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून त्यात महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपाने याकरिता शिवसेना व राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजे, कारण आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रामधून मंत्रिमंडळाला चेहरे मिळाले आहेत असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

कपिल पाटील हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट असून भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचं प्रोडक्शन आहेत. तर नारायण राणे हे आधी शिवसेना नंतर काँग्रेस असा प्रवास करून भाजपात गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचा आहे असं ते यावेळी म्हणाले.

तसेच राणेंच्या मंत्रिपदावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले की, “नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले असून नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. त्यांनी अनेक पदं सांभाळली असून ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत.”

तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली आहेत, मात्र प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ चेहरा त्यांनी गमावला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here