‘वर्ष २०१८ ते २०२३ या काळात होणार्या तिसर्या जागतिक महायुद्धात प्रचंड मनुष्यहानी होईल. भारतालाही या युद्धाची मोठी झळ बसेल. सर्वत्रच घरे, रस्ते, पूल, कारखाने इत्यादींची अपरिमित हानी होईल. युद्धाच्या शेवटी भारतात हिंदुराष्ट्राची स्थापना झालेली असेल.’
हे लिहिलं आहे सनातन संस्था या वादग्रस्त संस्थेचे संस्थापक जयंत बाळाजी आठवले यांनी. पुढे ते लिहितात, ‘भारतात हिंदुराष्ट्र स्थापन झाल्यामुळे जगभर हिंदू धर्माचा प्रसार करणे सुलभ होईल. ‘
महाराष्ट्र दहशतवाद-विरोधी पथकाने (ATS) वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तीन ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यां’ना अटक केली. मुंबई, पुणे, साताऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, असा दावा ATSनं केलाय.
यावर सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणतात की, “हिंदुत्ववादी वैभव राऊत हे सनातनचे साधक नाहीत. मात्र ते हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात सहभागी असत. हिंदुत्वासाठी कार्य करणारा, धर्मासाठी कार्य करणारा, कोणताही हिंदू कार्यकर्ता हा सनातनचाच आहे असं आम्ही मानतो.
वैभव राऊत हा सनातन संस्थेशी संबंधित कार्यकर्ता असल्यामुळे पुन्हा एकदा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती चर्चेत आले आहेत.
या दोन्ही संस्था एक आहेत की वेगळ्या, तसंच या संस्थांचं नेमकं कार्य काय? त्या शिकवतात काय? त्या चालवणारी माणसं कोण? त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
“वैभव राऊतच्या घरात बाँब आणि बाँब बनवण्याचे साहित्य सापडले. यावरून सनातन संस्था दहशतवादी कारवाई करत आहे, हे सिद्ध होतं” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला तर काँग्रेसने सनातनवर बंदीची मागणी केली.
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की सनातनवर बंदीचा प्रस्ताव दुरुस्त करून नव्याने केंद्र सरकारकडे पाठवला आहे.