प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. सोशल मीडियावर सक्रीय राहणाऱ्या प्रशांत किशोर यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर टीका केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्ष, करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व देशाच्या आर्थिक विकासाच्या मुद्यावरून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
#Corona शी लढाई २१ दिवसांमध्ये जिंकल्या गेली आणि #China शी लढण्यासाठी कोणी आलं नाही! आता उरला आर्थिक विकास तर त्याला सरकारी आकडेवारीवाले ठीक करतील…चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकार सांगत आहे की, सर्व काही ठीक आहे. बाकी आत्मनिर्भर बनण्यासाठी निवडणूक प्रचाराशी जुडून रहा. #झूठी_सरकार” असं प्रशांत किशोर यांनी ट्वटि केलं आहे.
मागील काही दिवसांपूर्वी देखील प्रशांत किशोर यांनी ट्विट केले होते. तेव्हा म्हटले होते की, राज्यांमध्ये निवडणुकांची तयारी असो अथवा राज्यसभेच्या जागांसाठी मतांची जमावजमव, आमच्या यंत्रणेची दक्षता आणि आमच्या नेतृत्वाचे परिणाम सर्वांना पाहण्यासाठी आहेत. बाकी चीनपासून ते कोविड व अर्थव्यवस्थेतील मंदीपर्यंत हे आत्मनिर्भर भारताच्या लोकांसाठी आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.
या अगोदर प्रशांत किशोर यांनी बिहारमधील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. “देशात सर्वात कमी टेस्टिंग, पॉझिटिव्ह रेट ७ ते ९ टक्के आणि ६ हजारांहून अधिक करोना रुग्ण असताना बिहारमध्ये करोनाऐवजी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. करोनाच्या भीतीपोटी तीन महिन्यांपासून आपल्या घरातून बाहेर न पडणाऱ्या नितीशकुमार यांना असं वाटत की, लोकांनी घराबाहेर पडून निवडणुकीत सहभागी होण्यात कसलाही धोका नाही,” असा टोला प्रशांत किशोर यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.
प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दल पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना काही दिवसातच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले होते, मात्र बिहारमध्ये करोनाचा फैलाव होत असताना सत्तारूढ एनडीएचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष असल्याची टीका करणारे ट्वीट किशोर यांनी केल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.