पुन्हा आमदार रोहित पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. त्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घासही या परतीच्या पावसाने हिरावून घेतलेला आहे. आज कोरोना आणि ओला दुष्काळ अशा दुहेरी संकटात राज्यातील शेतकरी अडकलेला आहे. त्यामुळे आर्थिक समस्याने ग्रासलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.
त्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तेतील नेते तसेच विरोधक सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलेले आहे. राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. तर केंद्राने मदत जाहीर करावी अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
“दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेतयंच, पण केंद्रानेही जीएसटीचे राज्याचे थकीत २८ हजार कोटी रूपये तातडीने द्यावेत. अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी,” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.