झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जाग करण्यासाठी भारत बंद! – अशोक चव्हाण
सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात उद्या मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने या बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यात राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला टोला लगावला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.
“गेल्या १२ दिवसांपासून देशातील अनेक शेतकरी दिल्लीत ठिय्या आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेले शेतकऱ्यांसंबंधीचे कायदे रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी सुरू आहे. या आंदोलनाला आता विरोधी पक्षांचा पाठिंबा असून आता हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे.
‘केंद्र सरकार सामंजस्याची भूमिका घेत नसताना दिसत आहे. शेतकऱ्यांशी केल्या जाणाऱ्या चर्चा निष्फळ ठरत आहेत. काहीही झाले तरी हे कायदे मागे घ्यायचे नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. अशा परिस्थितीत झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा आहे”, असं रोखठोक मत अशोक चव्हाण यांनी मांडले आहे.