चीनने अरुणाचल प्रदेशात वसवलं गाव, मुजोर चीनने दिल हे स्पष्टीकरण
भारताच्या हद्दीत सुरु असलेल्या बांधकामावर मुजोर चीनने यावर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. चीनच्या भूभागावर सुरू असलेले बांधकाम आणि विकासकामे सामान्य आहेत आणि त्यावर कुणी हरकत घेण्याचे कारण नाही,’असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले.
मागील वर्षी चीनने लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये हिंसाचारही झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. लडाखमधील तणाव निवळण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहेत. अशातच चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये एक गाव वसवले असल्याचे समोर आले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अरुणाचल प्रदेशमधील बांधकामाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी म्हटले की, ‘चीनची झग्नान प्रदेशाबाबत (दक्षिण तिबेट) भूमिका स्पष्ट आहे. ‘अरुणाचल प्रदेश’अशा काही प्रदेशाला आम्ही कधीच मान्यता दिलेली नाही. यावर (बांधकामावर) कुणी हरकत घेण्याचे कारण नाही. हा आमचा भूभाग आहे. ही बाब सामान्य आहे.
या वृत्तावर भारताने ‘देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. देशाचे सार्वभौमत्व जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत,’ अशी सावध प्रतिक्रिया दिली होती. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावे, यासाठी सीमेवरील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केल्याचे स्पष्टीकरणही परराष्ट्र मंत्रालयाने दिले.