शेतकरी आंदोलन चिघळले, पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवताच आंदोलकांनी उपसल्या तलवारी
कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत.
दरम्यान, आज होणारा प्रजासत्ताकदिन वैशिष्टय़पूर्ण असणार आहे. आज राजपथावर हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले. जवानांच्या भव्य परेडनंतर लाखो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड दिल्लीत सुरू आहे, देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमत आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यात सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस् तोडले आहेत. शेतकरी आंदोलक दिल्लीत प्रवेश करत असताना पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं. यावेळी पोलीस व शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी काही आंदोलक शेतकऱ्यांनी तलवारी बाहेर काढल्या त्यामुळे सध्या दिल्ली येथे तणावाचे वातावरण आहे.