लोकसभा निवडणुकीचे चित्र येणाऱ्या २३ तारखेला स्पष्ठ दिसून येईल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला कोण सत्तेत बसवणार आणि जनता कोणाला कायमची घरी बसवणार हे येणाऱ्या काही दिवसात समोर येईलच. त्यातच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्लीत सर्वच भाजपा विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा बैठकीत समावेश असणार आहे. काही झाले तरी भाजपाला सत्तेत येऊ द्यायचे नाही असेच या बैठकीचा प्रमुख मुद्धा असल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीसाठी काँग्रेसच्या चार नेत्यांची एक टीम बनवण्यात आली असून त्यामध्ये अहमद पटेल, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. हे नेते समविचारी पक्षांच्या नेत्यांशी आघाडीसंदर्भात बोलणी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस कडून पुढील घडामोडींची आणखी आणि मोर्चेबांधणी करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला सध्या एनडीएसोबत नसलेल्या बिजू जनता दल, टीआरएस आणि वायएसआर यांनाही निमंत्रण पाठवले गेले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा करून त्यांना आमंत्रण दिले आहे.