स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अभय आगरकर यांनी केली. वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील श्री रेणुकामाता मंदिरात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. श्री परशुराम प्रतिष्टानचे अध्यक्ष विजय देशपांडे आणि आदी यावेळी उपस्थित होते.
अॅड. अभय आगरकर म्हणाले की, स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास सर्वाना ज्ञात आहे. सावरकर हे क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, धर्माभिमानी आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते. त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान आणि आयुष्यभर त्यांनी कुटुंबासह केलेला त्याग याची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही. स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक यातना व कष्ट सहन केले. वेळ प्रसंगी त्यांना खोट्या गुन्ह्यात देखील गोवण्यात आले.
त्याकरिता त्यांना अग्निपरीक्षा देखील द्यावी लागली, परंतु सत्य हे सत्यच असते. अशा खोट्या गुन्ह्यातून ते निर्दोष मुक्त झाले. परंतु राष्ट्रीय पुरुषांचे चरित्र आणि चारित्र्य हे समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असतात त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त करीत आहोत.